Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र'या' सात जिल्ह्यात तलाठी भरती सुरू

‘या’ सात जिल्ह्यात तलाठी भरती सुरू

मुंबई । Mumbai

- Advertisement -

अहमदनगरसह धुळे, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आणि सातारा अशा सात जिल्ह्यात तलाठीपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसईबीसी ( सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिली.

सात जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, विधी आणि न्याय विभागाने दिलेल्‍या सल्‍ल्‍यानुसार सात जिल्हयातील २०१९च्या तलाठी पदभरतीतील एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अहमदनगर , धुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आणि सातारा अशा ७ जिल्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.

सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या