संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम मुंबईसह राज्यात कुठेही होणार नाही. जनतेच्या नव्हे तर फक्त एकमेकांच्या आधारासाठी एकत्र आले आहेत. मराठी माणूसच त्यांना हद्दपार करील. दोघांच्या एकत्र येण्याचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नसल्याचे परखड मत जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
संगमनेरमध्ये शनिवारी (दि.27) माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, दोघा भावांची युती ही त्यांची गरज आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही. त्यांच्या काळातच मराठी माणूस उध्वस्त झाला असल्याकडे लक्ष वेधून लोकांचा पूर्ण विश्वास महायुतीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये ज्या वेगाने विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे त्याला मुंबईची जनता निश्चित साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आमची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करतोय. विरोधकांकडे आज उमेदवार नाहीत त्यांच्याकडे उमेदवारी मागायला कोणी जायला तयार नाही. ज्यांना डावलेले जाईल तेच विरोधकांचे उमेदवार असतील आशी टिपण्णी मंत्री विखे पाटील यांनी केली. तर ज्यांनी स्वतःच्या तालुक्यात काँग्रेस पक्षाला तिलांजली दिली तेच पक्षाचे आता स्टार प्रचारक झाले याचे आश्चर्य वाटते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीबरोबर राहणेच उचित ठरेल. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. मतदारांच्या रंगीत फोटोसह नावांच्या याद्या समाज माध्यमांवर प्रसिध्द होत असतील तर ते गंभीर गंभीर आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.




