मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आता संपूर्ण राज्याचे लक्ष २२ जानेवारीकडे लागले आहे. मुंबईत भाजपने ८९ जागांसह मोठे यश मिळवले असले तरी, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘लॉटरी’ ठरू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत. मुंबई महापालिकेत सत्तेचा पेच सोडवण्यासाठी सध्या पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून, नगरविकास विभागाने आगामी २२ जानेवारी रोजी महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्याची घोषणा केली आहे.
निकालांच्या आकडेवारीनुसार, मुंबईत भाजप ८९ जागांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ६५ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी आवश्यक ११४ चा आकडा गाठण्यासाठी महायुतीला अपक्षांची साथ आवश्यक आहे. मात्र, महापौर पदासाठीचे आरक्षण जर ‘अनुसूचित जमाती’ (ST) प्रवर्गासाठी निघाले, तर उद्धव ठाकरेंकडे सत्तेच्या चाव्या जाऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे, संपूर्ण मुंबईत फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच दोन अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५३ आणि प्रभाग क्रमांक १२१ हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. प्रभाग ५३ मधून जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाचे अशोक खांडवे यांचा पराभव केला, तर प्रभाग १२१ मध्ये प्रियदर्शनी ठाकरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांना धूळ चारली. अशा स्थितीत, जर २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता मंत्रालयात होणाऱ्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौर पद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर महायुतीकडे या प्रवर्गातील एकही उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण होऊ शकतो.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी “देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल” असे केलेले विधान याच तांत्रिक बाबीकडे निर्देश करणारे असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, फोडाफोडीच्या भीतीने एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये ठेवले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही “महापौर महायुतीचाच होईल” असा ठाम विश्वास व्यक्त केला असला तरी, आरक्षणाची सोडत चक्राकार (Rotation) पद्धतीने निघाल्यास महायुतीची गणिते बिघडू शकतात.
येत्या २२ जानेवारीला केवळ मुंबईच नाही, तर राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे भवितव्य ठरणार आहे. मुंबईत गेल्या दोन दशकांपासून अनुसूचित जमातीचा महापौर झालेला नाही, त्यामुळे रोटेशननुसार यंदा या प्रवर्गाला संधी मिळण्याची दाट शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जर हे घडले, तर सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ नसूनही उद्धव ठाकरेंचा महापौर खुर्चीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.




