Tuesday, March 25, 2025
Homeशब्दगंधपुन्हा सतर्कतेची गरज

पुन्हा सतर्कतेची गरज

दोन वर्षांपूर्वी जेव्हा कोविड विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने होऊ लागला तेव्हाच आगामी काही वर्षे कोविडसोबत जगावे लागणार असे विषाणू तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. कारण करोना विषाणूला पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही. तथापि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे आणि एका मर्यादेपलीकडे अथक प्रवास केल्यामुळे या विषाणूंची क्षमता कमी होत जाते. तथापि त्यांच्यातील म्युटेशन सुरूच असते. त्यातून नवे व्हेरिएंट जन्माला येतात. सध्या अशाच दोन व्हेरिएंटस्मुळे कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांची संक्रामक क्षमता अधिक असल्यामुळे खबरदारीच्या उपायांबाबत हलगर्जीपणा न करणे योग्य ठरेल.

आठ जून रोजी करोनाचे देशात चोवीस तासांत पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. देशात अजूनही 28 हजार रुग्णांंवर उपचार सुरू आहेत. हा आकडा धोकादायक नाही. परंतु महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांत बीए-4 आणि बीए-5 व्हेरिएंट आढळून आल्याने चिंता थोडीशी वाढली आहे. अर्थात, हे दोन्ही व्हेरिएंट नवीन लक्षणांमध्ये गणले जात नाहीत आणि त्याचा गंभीर आजाराशीदेखील संबंध नाही. ओमायक्रॉननंतरचा नवीन व्हेरिएंट म्हणून त्याकडे पाहता येऊ शकेल. मात्र या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण हे दोन्ही व्हेरिएंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आले होते आणि तेव्हाच ते मोठ्या प्रमाणावर संक्रमण करणारे आहेत, असे लक्षात आले होते. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात उत्तरेकडील भागात असणार्‍या लिम्पोपो येथे या व्हेरिएंटचा उगम झाल्याचे समोर आले. तेथेे लोकसंख्या खूप कमी आहे. आतापर्यंत बहुतांश नवे व्हेरिएंट हे शहरी भागातच आढळले आहेत, ही बाब लक्षात घ्यायला हवी.

बीए-5 हा पहिल्यांदा 25 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्वेकडील जुलू-नताल या भागात आढळून आला. परंतु आज तो दक्षिण आफ्रिकेतील अन्य प्रांतातदेखील पसरला आहे. यावरून याची संक्रामक क्षमता अधिक असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisement -

विषाणू आणि त्यांच्या नवनव्या व्हेरिएंटचे आकलन करताना त्यांची संक्रमण क्षमता आणि घातकपणा हे दोन निकष महत्त्वाचे ठरतात. विषाणूतज्ज्ञांच्या मते बहुतेकदा संक्रमण अधिक वेगाने करणारे विषाणू तितक्या प्रमाणात घातक नसतात. त्यामुळेच अशा विषाणूंचा संसर्ग होणार्‍यांमध्ये मृत्युदर कमी आढळतो. अर्थातच हे ठोकताळे असतात. त्यांना मागील काळातील अभ्यासाची जोड असली तरी प्रत्येक वेळी तशीच स्थिती राहील, असे ठोसपणाने सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर आपल्याला या नव्या व्हेरिएंटस्ची लागण क्षमता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत बीए-4 व्हेरिएंट रुग्णांची टक्केवारी जानेवारी 2022 मध्ये एक टक्का असताना ती एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 35 टक्क्यांपर्यंत पोहोचली. एप्रिलच्या शेवटपर्यंत बीए-5 संसर्गबाधित रुग्णांचे प्रमाण 20 टक्के होते. यानुसार हा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरतो, असे लक्षात येते.

मागील काळात सामूहिक लसीकरणाने मिळवलेली हर्ड इम्युनिटी आता कमी होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेत जानेवारीतच ओमायक्रॉनमुळे चौथी लाट आली आणि आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी बीए-4 आणि बीए-5 चे वाढते प्रमाण पाहता पाचव्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनच्या रूपातून आलेल्या तिसर्‍या लाटेनंतर आता चौथी लाट येऊ शकते, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने केंद्रीय यंत्रणांबरोबरच राज्य सरकारांच्या आरोग्य यंत्रणाही तयारीला लागल्या आहेत. कोविड टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन स्थिती ओढवल्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठीही आरोग्य प्रशासन कामाला लागले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे संकट उद्भवल्यामुळे काळजीत भर पडली आहे. मुळातच ऋतुबदलांच्या काळात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. कोविड विषाणू संसर्गानंतर उद्भवणारी लक्षणेही याच धाटणीची असल्यामुळे बहुतेक जणांचे त्याकडे दुर्लक्ष होते. पण हे दुर्लक्षच संक्रमणवाढीस हातभार लावणारे ठरते. मुळातच आरोग्यशास्रानुसार कोणत्याही रोगाचे निदान जितक्या लवकर होईल तितके त्याच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. अगदी कर्करोगांपासून मधुमेहापर्यंत सर्वच आजारांबाबत ही बाब लागू होते. पण बहुतेकदा याच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. काही वेळा निदान वेळेवर होत नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनते. कोविड संक्रमणाच्या मागील तीन लाटांमध्येही ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे.

आज कोविड प्रतिबंधात्मक लसींचे दोन डोस मिळाल्यामुळे भारतीय नागरिकांचे सुरक्षा कवच हे दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. भारतीय नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळेच पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेप्रमाणे भारताची स्थिती ढासळणार नाही, हे निश्चित आहे. पण तरीही नागरिकांनी खबरदारीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तसेच याबाबत शासन यंत्रणांनीही सजग राहणे गरजेचे आहे. सततच्या लाटांमुळे कोविडबाबत समाजात गांभीर्यभाव कमी झाला आहे. अनेक जणांमध्ये तर आज हा चेष्टेचा, मस्करीचा विषय बनला आहे. परंतु यामुळे होणार्‍या हलगर्जीपणाचा परिपाक करोनाची नवीन लाट येण्यात होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. सद्यस्थिती पाहता करोनाची तपासणी पूर्वीसारखीच काटेकोरपणे होत आहे की नाही, यावर आगामी स्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच लोकांनी तपासणीबाबत टाळाटाळ करू नये आणि त्या यंत्रणेतही त्रुटी राहता कामा नयेत.

विषाणूंचे संक्रमण ही एक नैसर्गिक प्रक्रियेतील घटना आहे. विषाणूंच्या विश्वाचा आणि त्यांच्यात होणार्‍या बदलांचा अभ्यास व संशोधन आजही सुरू आहे. त्यामुळेच त्याबाबत भविष्यातील भाकिते वर्तवणे हे तितकेसे सोपे नाही. म्हणूनच ही चौथी लाट आहे का? पाचवीदेखील येईल का? या प्रश्नांची उत्तरे ठोसपणाने सांगता येणार नाहीत.

एक गोष्ट निश्चित की, करोना संसर्ग हा कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे थांबणार नाही. त्याच्या स्वरुपात बदल होत आहे आणि जोपर्यंत स्वरूप बदलत राहील तोपर्यंत चिंता कायम राहील. विषाणू हे निसर्गसाखळीतील एक घटक आहेत. त्यांचे अस्तित्व मानव पुसून टाकू शकत नाही. त्यामुळे आपण केवळ बचावात्मकतेवर अधिक भर देणे आवश्यक आहे. यासाठी काळानुसार लसीकरणात आणि उपचारात सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून करोना स्थितीचे गांभीर्य वाढणार नाही. भारतात लसीकरण मोहीम यशस्वी झाली असून याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. पण आता नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने या आघाडीवर सध्या जराही उत्साहवर्धक वातावरण दिसत नाहीये. करोनाच्या नव्या लाटेचा सामना किती समर्थपणे करतो यावरच आपला पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे. आपण बदलत्या संसर्गाला ओळखू शकतो. म्हणूनच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सरकारी प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत मदत करायला हवी. करोना संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सार्स कोविड-2 जिनोमिक्स कंन्सोर्टियमची नियुक्ती करण्यात आली असून त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, जैव तंत्रज्ञान विभाग, औद्योगिक संशोधन परिषद आणि भारतीय उपचार संशोधन परिषदेचा समावेश आहे. करोनावर देखरेख ठेवणार्‍या 26 प्रयोगशाळांचा हा एक गट आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पर्यवेक्षण, तपासणी, निदान आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित करतच आगामी वाटचाल करावी लागणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...