Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिव्यांगांच्या मानधनात वाढ होणार

दिव्यांगांच्या मानधनात वाढ होणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांना दिल्या जाणार्‍या मानधनात वाढ ( Increase in emoluments paid to persons with disabilities)करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार दिव्यांगांना 500 ते 800 रुपयांची वाढ मिळेल, अशी माहिती माजी राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu )यांनी दिली. सध्या दिव्यांगांना महिना एक हजार रुपयांचे मानधन मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बच्चू कडू उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती कडू यांनी पत्रकारांना दिली.

या बैठकीत राज्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचा, दिव्यांगांसाठी स्वाधार योजना तसेच संत गाडगेबाबा यांच्या नावे स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय आगामी अर्थसंकल्पात दिव्यांग विकास विभागासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्यात येणार असल्याचे कडू यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. दिव्यांग बांधव हे समाजातील महत्वाचे घटक आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता, कलागुण असून त्याला वाव देण्यासाठी महामंडळामार्फत प्रयत्न झाले पाहिजेत. महामंडळाला 500 कोटींचे भाग भांडवल देण्यात आले असून गेली काही वर्ष थांबलेले कर्जवाटप आता पुन्हा सुरू होईल. त्यामुळे दिव्यांग बांधव स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या