मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित घडामोड आज अखेर घडली आहे. ठाकरे बंधूंनी सर्व मतभेद बाजूला सारत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आगामी संघर्षासाठी एकत्र येत असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण उदयाला आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली. “संपूर्ण ठाकरे घराणे मुंबईसाठी संघर्ष करत आले आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राने रक्त सांडून मुंबई मिळवली, मात्र त्यानंतर काही उपरे येथे येऊन नाचू लागले. याच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती,” अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
येत्या वर्षात शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. इतकी वर्षे सर्व काही सुरळीत सुरू असताना पुन्हा एकदा मुंबईच्या अस्तित्वावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. दिल्लीत बसलेल्या दोन व्यक्तींनी मुंबई तोडण्याचा कट रचला असून, आता जर आपण आपापसात भांडत बसलो, तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे आखणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्रावर कोणीही वाकडी नजर टाकली किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचा राजकीय खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेला पूर्वजांचा संघर्ष आम्ही वाया जाऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता जर तुम्ही चुकलात किंवा फुटलात, तर कायमचे संपून जाल. त्यामुळे आता तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा सोडू नका.” मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कपटी डाव हाणून पाडण्यासाठी ही युती काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या युतीमुळे आता राज्यातील राजकीय पटलावर मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




