मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका येत्या १५ जानेवारीला पार पडणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील निवडणुका शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अद्यापही जागावाटपावर खल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असला तरी वरळी, शिवडी, माहीम, विक्रोळी आणि भांडुप या पाच विधानसभा मतदारसंघांतील पालिका प्रभागाच्या जागांवरून दोन्ही पक्षांचे जागावाटप रखडले आहे. दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून येऊ लागल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या जनसेवेबाबत सविस्तर माहिती देणारी पुस्तिका शिवसेना भवन येथे प्रकाशित केली. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख , आमदार, खासदार यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
तुमच्यापैकी कुणीही फुटता कामा नये
आपल्या डोळ्यांदेखत हुतात्मांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई दोन गुजराती लोकांना गिळायची आहे. आपण जर आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षांना महत्त्व देत, तुझे माझे करणार असू तर दुफळीचा फायदा लोक घेतील. तुमच्यापैकी कुणीही फुटता कामा नये. मी अगतिकतेने बोलत नाही. पण माझ्या खुर्चीत बसून बघा.
दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले
भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे काही करून आता भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल; पण, तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझे माझे करत बसलो तर माझे म्हणणे आहे की, लढाई न लढलेले बरे. मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, तुमच्याशी हे मी आगतिक होऊन बोलत नाही. मला २२७ लोकांची निवड करायची आहे. मला नाशिक, पुणे, ठाणे सगळीकडे पाहायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसचा अनुभवही तुम्हाला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मनसेशी युती केली आहे. युती, आघाडी असते तेव्हा १०० टक्के मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. काही जागा हक्काने सोडाव्या लागतात. काही वेळा त्यांच्या जागा असतात त्या त्यांना सोडाव्या लागतात. कुठलाही वाद न घालताना युती केली आहे.




