मुंबई | Mumbai
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेनेचा ठाम विरोध राहील, असे स्पष्ट करतानाच त्यांनी कुंभमेळ्यातील खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या भूमिकेमुळेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याचा गंभीर आरोपही केला. याचवेळी त्यांनी राज्यसभा सचिवालयाच्या सदस्यांच्या वर्तवणुकीसंबंधी परिपत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडे बोल सुनावले.
पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबद्दल बोलताना ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “कुंभमेळा व्हायलाच हवा, कारण ती अनेक वर्षांची परंपरा आहे. गेल्यावेळीही तिथे कुंभमेळा झाला होता. तिथे येणाऱ्या लाखो साधू-संत आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुविधा पुरवण्याचे काम सरकारचे आहे,” असे ते म्हणाले. गेल्यावर्षी प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीत भाविकांचा जीव गेला होता, या घटनेचा उल्लेख करत, “भाविकांना सोयी-सुविधा देताना पारदर्शकपणा असला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “आजही नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही, हे एक कोडे आहे. या कोड्याचे उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण खर्चात आहे का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला घेरले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू ग्राम होणार आहे. ते नेमके मागच्या वेळेस कुठे झाले होते, याची माहिती आपण मिळवू शकतो. पण, यावेळी तपोवन नष्ट करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त साधू ग्रामची निर्मिती होणार आहे. मागील वेळेस ते नेमके कुठे झाले होते, याची माहिती मिळू शकते. मात्र, यावेळी तपोवनातील काही झाडे तोडण्याच्या वृत्तावर ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला. “तपोवन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण काही काळ वास्तव्यास होते, अशी मान्यता आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोजक्या जागांपैकी तपोवन ही एक आहे,” असे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “तपोवनमध्ये जवळपास ६० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, त्यातील अनेक औषधी वनस्पती आहेत. अनेक वर्षांपासून तिथे निसर्गाचे चक्र सुरू आहे. या तपोवनाने आपल्यापेक्षाही जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील,” असे सांगत तपोवन नष्ट करण्याच्या निर्णयाला शिवसेना ठामपणे विरोध करेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




