मुंबई | Mumbai
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीतील त्रुटी, दुबार नावे आणि बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी विरोधकांकडून केल्या जात आहेत. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.
मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मतदान हा आपल्यासाठी नवीन विषय नाही. पण मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारला, मतदान केलं का? पण असा प्रश्न विचारला पाहिजे होता, शाई पुसली का? कारण यावेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपुर प्रयत्न केला की, दुबार मतदार, ईव्हीएमचा खेळ, आता तर बाईचं नाव रविंद्र असे समोर आले आहे. पुरुष मतदाराच्या पुढे बाईचा फोटो आहे. याच गोष्टी आम्ही मोर्चा काढून सांगितल्या होत्या, निवडणूक आयोगाच्या समोर ठेवल्या होत्या. त्यानंतर आता शाई पुसण्याच्या तक्रारी येत आहेत.
बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप; निवडणुक आयोगाकडून स्पष्टीकरण
धक्कादायक म्हणजे कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप उमेदवाराच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्र चालवले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हे सर्व निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा सुरू आहे. बोटावरची शाई पुसली जात असल्याचा प्रकार यापूर्वी कधी झाला नव्हता. साधारणत: मी मतदान केल्यानंतर माध्यमांनी माझ्याशी संवाद साधला. त्यावेळी मी प्रश्न विचारला होता की, नेमके निवडणूक आयोग आणि आयुक्त 365 दिवस कसला पगार खात आहेत?
महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानाचा आणि मतमोजणीचा वेगवेगळा दिवस आहे. आता, प्रभाग क्रमांक 226 चे पत्र बघा, टपाली मतदान जे झाले आहे, त्यात दुपारी ३ वाजता स्ट्राँग रुममधून बाहेर काढण्यात येणार आहेत, त्यासंदर्भात सूचना द्यायला हवी. संविधान म्हणते मतदार करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा, असे सगळे सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणतात हा रडीचा डाव आहे, मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घरगडी नेमले आहात का? त्यांना इतकी खा.. खा.. कशी काय सुटली आहे. महायुतीकडे कर्तृत्व नाही आहे, गणेश नाईक यांचा टांगा आहे की नाही, का फिरुन फिरुन टांगा दुखल्या त्यांच्या, टांगा दुखल्या, घोडा फरार.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात हा रडीचा डाव आहे. मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घर गडी नेमले आहात का? महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका जिंकण्याकरताही महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीय. गणेश नाईकांचं मतदान केंद्रच फरार होतं. त्यांना मतदान केंद्र शोधण्याकरता चार तास लागले. ही मंत्र्यांची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. त्यामुळे खेटे घालून त्यांच्या टांगा दुखल्या आहेत. डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे? हा प्रश्न गणेश नाईकांसमोर आहे. यावर इलाज म्हणून निवडणूक आयुक्तांना निलंबित करावं. कारण ते फुकटचे पैसे खात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करत आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.





