नवी दिल्ली | New Delhi
१५ दिवसांपूर्वी झालेल्या पुरुष अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशने (Bangladesh) टीम इंडियाचा (Team India) पराभव केला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने (India Women’s Team) या पराभवाचा बदला घेतला आहे. महिला अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी (दि.२२ डिसेंबर) रोजी पार पडला. मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या या सामन्यात भारताने ४१ धावांनी बांगलादेशवर विजय मिळविला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या महिला संघाने ११७ धावा केल्या होत्या. ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ७६ धावांवर गडगडला.दुसऱ्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का बसला. तर मोसमत इवाला आपलं खातंही खोलता आले नाही. त्यानंतर आलेली सोमेया अक्तरही ८ धावांवर बाद झाली. फहोमिदा चोया आणि जुएरिया फिरदौस यांनी काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही फार काही यश आले नाही. या दोघांव्यतिरिक्त बांगलादेशचे इतर खेळाडू (Player) एकेरी धावांवरच तंबूत परतले. त्यामुळे भारताचा विजय पक्का होत गेला. भारताकडून सोनम यादवने ४ षटकात ३ धावा देत २ गडी गडी बाद केले. तसेच पारुनिका सिसोदियाने २ आणि जोशिताने १ बळी घेत तिला साथ दिली.
दरम्यान, भारताची सलामीवीर जी त्रिशाला अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्याबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पहिल्या डावात जेव्हा टीम इंडियाची दमछाक झाली तेव्हा तिने जबाबदारी घेतली. ती एका टोकाला चिकटून राहिली आणि हळूहळू धावसंख्या वाढवत राहिली. इतकंच नाही तर त्रिशाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही निवडण्यात आले. ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.त्रिशाने ५ डावात १२० च्या स्ट्राईक रेटने आणि ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या. तर अंतिम सामन्यात आयुषी शुक्लाने ३.३ षटकात १७ धावा देत ३ बळी घेतले आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. तिने ५ सामन्यात १० विकेट घेतल्या.