नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (रविवारी) नवव्यांदा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या वर्गासाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. यानंतर सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात सुरुवात केली.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संत रविदासांचे नाव घेऊन भाषणाची सुरुवात केली. आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे असे म्हणत त्यांनी देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, दारिद्र्य निर्मूलनापासून ते रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांवर भर दिला.१२ वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य नव्हते, राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात होती. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर यायला सुरूवात झाली. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व्हायला सुरूवात झाली, असं त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या की, गुंतवणूक वाढवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, आर्थिक विकासदरात वाढ हे आमचे पहिले मोठे कर्तव्य आहे. लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर आमचा भर राहिला असून, आर्थिक रचनात्मक सुधारणा आमच्या सरकारने घडवून आणल्या. दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात आला. आमचे सरकार आयातीवरची निर्भरता कमी करत आहे. भारताला बायो हब करण्याचे आमचे स्वप्न असून, भविष्यात याबाबत निर्णय घेतले जातील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.





