अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा व कर्जतसह 9 तालुक्यांत मंगळवारी एकाच दिवसात वादळी वारा, अवकाळी व अतिवृष्टीमुळे तब्बल 171 गावे बाधित झाली असून या गावातील 3 हजार 513.55 हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा 6 हजार 85 शेतकर्यांना फटका बसला आहे. या दिवशी सर्वाधिक नुकसान अहिल्यानगर तालुक्यात झाले असून 4 हजार 176 शेतकर्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. दरम्यान, मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे एकट्या नगर जिल्ह्यातील 11 हजार 80 शेतकर्यांच्या 5 हजार 695 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
दरम्यान, मंगळवार (दि. 27) रोजी चालू महिन्यांतील सर्वात विनाशकारी पाऊस कोसळला असून यात अहिल्यानगर, पारनेर या तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाःकार निर्माण केला. या पावसाच्या रुद्रावतार पावसामुळे या दोन तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुखाने कांदा, आंबा, मिरची, मका, उडीद, कलिंगड, खरबूज, चारापिक, भुईमूग, डाळिंब, केळी, बाजरी, भाजीपाला आदी पिकांचा समावेश असून नुकसानीचा हा आकडा प्राथमिक असून त्यात वाढ अथवा घट होवू शकते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, अकोले तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात 171 गावे बाधित झाली आहेत. अहिल्यानगर व पारनेर या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केला. अहिल्यानगर तालुक्यात 45 गावांतील 2 हजार 559.10 हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी बाजरी, कांदा, मिरची, फ्लॉवर, संत्रा, डाळींब, शेवंती, भूईमुग या पिकांचे नुकसान झाले असून 4 हजार 176 शेतकर्यांना त्यांचा फटका बसला आहे. तर पारनेर तालुक्यात 34 गावांमधील 75.4 हेक्टर क्षेत्रातील कांदा, टोमॅटो, टरबूज, आंबा, कोबी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात 183 शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
तर कर्जत तालुक्यात 36 गावे बाधित झाली असून 219.80 हेक्टर क्षेत्रातील कांदा, बाजरी, भाजीपाला, पेरू, भुईमुग, लिंबू, मका, उडीद, टोमॅटो, खरबूज, आंबा या पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे 440 शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे. अन्य तालुक्यातील नुकसान पुढीलप्रमाणे आहे. पाथर्डी 1 गावे 0.40 हेक्टर क्षेत्र, 1 शेतकरी, श्रीगोंदा 33 गावे, 460.55 हेक्टर क्षेत्र तर 858 शेतकरी, जामखेड 10 गावे, 15.9 हेक्टर क्षेत्र तर 35 शेतकरी, राहुरी 15 गावे, 130.7 हेक्टर क्षेत्र तर 305 शेतकरी, नेवासा 5 गावे, 50.4 हेक्टर क्षेत्र व 85 शेतकरी, अकोले 1 गावे, 0.40 हेक्टर क्षेत्र तर 1 शेतकरी आहे. कोपरगाव 1 गावे 1.71 हेक्टर क्षेत्र असून 1 शेतकरी आहे.
खा. लंके यांच्याकडून पाहणी
सलग दहा, बारा दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात मोेठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, यासाठी गुरूवारी (दि.29) खासदार निलेश लंके व पदाधिकारी कार्यकत्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या पाहणी दौर्यात खासदार लंके यांच्यासह जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, नगरसेवक योगीराज गाडे, तालुकाध्यक्ष राजू भगत, नितीन पवार, वसंत गारुड, अरुण जाधव, सचिन शिंदे, बहु गहिले, सुहास कासार, संदिप बोठे, दिलीप भालसिंग, सागर कासार, माऊली लंके यांचा समावेश होता.