मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर आता हा अवकाळी पाऊस महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडकला असून मुंबईतील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यानंतर आता हाच अवकाळी पाऊस येत्या ३ ते ४ तासांत नाशिकसह पालघर आणि ठाणे परिसरात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने ( Meteorological Department) वर्तवला आहे.
सध्या मुंबईतील (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया परिसरात जोरदार वारे वाहत असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन या भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच संपूर्ण मुंबई परिसरातील (Mumbai Area) काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. याशिवाय घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक देखील विस्कळीत झाली. तर कमी दृश्यमानतेचा परिणाम मुंबई एअरपोर्टवरील (Mumbai Airport) विमानसेवेवर झाला असून या विमातळावरील वाहतूक पुढील माहिती मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे.
तर दुसरीकडे हवामान विभागाने पुढील ३ ते ४ तास वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी प्रति तास राहणार असल्याचे म्हटले असून नाशिक, ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain With Gales) शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर पुणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळे या जिल्ह्यांत देखील पुढील ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.