बोरगाव । वार्ताहर Borgaon
सुरगाणा तालुक्यातील 195 गावातील अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विशेषतः आंबा आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना मोठा फटका बसला असून एकूण 4411 शेतकर्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे 486 हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांवर फळगळ, कीड आणि रोगराई यांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. काढणी जोग आलेला आंबा कोसळल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे 107.70 हेक्टर क्षेत्रातील कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
कांद्याच्या पिकावर पावसामुळे कुज येत असून साठवणीत ठेवलेला कांदाही खराब झाला आहे. परिणामी कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता असून, शेतकर्यांना दुहेरी फटका बसत आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 4411 शेतकर्यांचे अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदार राठोड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेतकरी संघटनांकडून शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, पीक विमा आणि आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. भविष्यातील शेती हंगामावरही याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पेठला नुकसान
खरीप हंगामातील पूर्व तयारी म्हणून शेतीसाठी व घरगुतीसाठी आवश्यक साधने गोळा करावी लागतात. अगदी जनावरांच्या चार्यापासून ते घरातील इंधनासाठी सरपण, गोवर्या भिजल्याने तसेच शेतकर्यांनी शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर लावलेल्या केशर, हापूस, राजापुरी आदी कलमी आब्यांना आलेल्या फळाचे आतोनात नुकसान झाल्याचे दिसत आहे.