पुणे | Pune
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पण यावेळी न्यायालयामध्ये वैष्णवी हगवणेच्या विरोधात युक्तिवाद करताना अनेक दावे हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आले. या नंतर आता वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन मुलीचे चारित्र्यहनन होत असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहे. वैष्णवी दुसऱ्या एका मुलासोबत चॅट करत होती. त्यावरून तिला अनेकदा समज देण्यात आली होती. त्यावरूनच तिला अनेकदा आम्ही माहेरी सोडली होती, असा युक्तिवाद हगवणे यांनी न्यायालयात केला. त्यांच्या आरोपांवर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी उत्तर दिले.
वैष्णवी हगवणेला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाच्या बचावासाठी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले, असे करू नका, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. यावेळी विनंती करतना तिच्या वडिलांना रडू कोसळले.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले, “बुधवारी (28 मे) आरोपींचे वकील काय म्हणाले? ते सर्वांनी ऐकले बोलले ते सर्वांनी ऐकले असून समाजानेही ऐकले आहे. ते चुकीचे बोलले आहेत. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहे. ते म्हणतात त्यांच्याकडे ५ कोटींच्या गाड्या होत्या, पण त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. मला लग्नात त्यांनी गाडी मागितली होती. माझ्या मुलीची आधी २ लग्न मोडली होती, त्यामुळे त्यांनी लग्नावेळी वेगवेगळ्या मागण्या केल्या. मागण्या पुर्ण केल्या नाही तर लग्नासाठी उभे राहणार नाही असे सांगितले. त्यांनी चांदीची भांडीदेखील मागितली. त्यांची ती मागणीदेखील पूर्ण केली. चर्चा वेगळीकडे चालली असून त्या वकिलांनी केलेले दावे खोटे आहेत. त्यांनी केलेले कृत्य माझ्या मुलीचा बळी या प्रकरणाला वेगळी कलाटणी द्यायचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी माझ्या मुलीच्या अंगावर शिंतोडे उडवले आहेत. ” असे आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
हगवणे कुटुंबाने मोबाईलच्या चॅटची आम्हाला कोणतीही कल्पना दिली नव्हती. जर मला माझ्या लेकीचा मोबाईल काढून घ्यायचा असता, तर मी आधीच मोबाईल दिला नसता. आरोपी शशांक हगवणेला देखील मीच मोबाईल घेऊन दिला होता. वाकडच्या क्रोमा शोरूमधून १ लाख ५२ हजारांचा फोन मी त्यांच्या मागणीनुसार घेऊन दिला होता. शशांक हगवणे वाकडच्या क्रोमामध्ये आला होता. तिथून त्याने माझ्या मुलीला फोन केला. त्यांच्यात वादावादी झाली. मुलीला तो काहीतरी बोलला. त्यानंतर दोघांच्यातला वाद मला मुलीने सांगितला. मी वाकडला जाऊन लगोलग इएमआयवर १ लाख ५२ हजारांचा फोन घेऊन दिला, असे सांगत अनिल कस्पटे यांनी मोबाईलची पावतीही दाखवली. तसेच जावई जेलमध्ये असतानाही आम्ही इएमआय भरतोय, असे अनिल कस्पटे यांनी सांगितले.
पुढे अनिल कस्पटे म्हणाले की, “चार चापटा मारणे म्हणजे गुन्हा नाही, असे वकील म्हणतात, ही हास्यास्पद गोष्ट असून हे वाईट आहे. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी ५ ते ६ दिवस सातत्याने हगवणे कुटुंब तिला मारहाण करत होते. माझी मुलगी तर आता गेली आहे, वैष्णवीवर आता काहीही आरोप करून शिंतोडे उडवू नका,” असे म्हणत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. ते हुंदक्यांनी दाटले होते. अनिल कस्पटे भावुक झाल्याचे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पत्रकार परिषद थांबावायला लावून त्यांना धीर दिला आणि तेथून घेऊन गेले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा