Thursday, September 19, 2024
Homeराजकीय'गरज सरो वैद्य मरो' म्हणत प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर संतापले; कारण काय?

‘गरज सरो वैद्य मरो’ म्हणत प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर संतापले; कारण काय?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्यात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (MVA) सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडीने एकूण ३० जागांवर विजय मिळवला आहे. मुंबईतील (Mumbai) लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागाही महाविकास आघाडीने जिंकल्या आहे.

यामध्ये ठाकरे गटाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, त्यांनी आभार मानताना ज्यांच्या उल्लेख केला त्यामध्ये दलित आणि बौद्ध हा उल्लेख केला नाही. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर गरज सरो वैद्य मरो अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच ‘घरात आहे पीठ’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.

आंबेडकरांचे ट्विट

‘गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण उच्च वर्णीय हिंदू नी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिव सेना किंवा महा विकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलीत आणि बौद्धांने आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही! #घरात_आहे_पीठ

हे देखील वाचा : विधानसभेसाठी ‘मविआ’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोण किती जागा लढवणार?

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केले. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू होते, मुस्लीम होते आणि ख्रिश्चनदेखील होते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्याने सोशल मीडियावर अनेकजण नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनुक्रमे संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले होते. या मतदारसंघांमधील बौद्ध आणि दलितबहुल भागात ठाकरे गटाला भरभरुन मतदान झाले होते.

प्रकाश आंबेडकरांनी वापरलेल्या “घरात आहे पीठ”चा नेमका अर्थ काय ?

प्रकाश आंबेडकर यांनी पोस्टच्या शेवटी #घरात_आहे_पीठ हॅशटॅग वापरला आहे. हा हॅशटॅग वापरुन त्यांनी दलित-बौद्धांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दलितांबद्दल काय दृष्टीकोन होता याची आठवण करुन दिली आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनादरम्यान बाळासाहेब ठाकरे हे नामांतराच्या विरोधात होते. त्यावेळी त्यांनी घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ अशी हेटाळणी आंबेडकरी समुह, नामांतरवाद्यांची केली होती. त्याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी घरात आहे पीठ हॅशटॅग वापरुन करुन दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या