मुंबई | Mumbai
राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे राज्यातील शेकऱ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मदतीच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, महायुती सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये गेल्या १५ दिवसात ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगितले. ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
केंद्राने काय मदत केली ते जाहीर करावे
वडेट्टीवार पुढे म्हणाले, कर्जमाफीची अपेक्षा होती ती पुर्ण झाली नाही, ती कधी करणार? तसेच, केंद्राने मदत केली आहे का ? असा प्रश्न विचारत वडेट्टीवार यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडास पाने पुसली आहेत, अशी टीका केली. दुर्दैवाने आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचा निर्णय झाला आहे. निवडणुकीच्या पुर्वी मत मिळवण्यासाठी तुम्ही निर्णय घेता. सरकारने तिजोरी खुली केली पाहीजे होती. केंद्र सरकारने काय मदत केली ते देखील जाहीर करावे. फळबांगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने हा आकडा फुगवून दिलेला आहे. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघाली आहे. त्यांची जनावर वाहून गेली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती. अस असताना NDRF निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्धवस्त होईल.
सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीआधी मिळणार का?
पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी 50 हजार पर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही? सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे का?शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आला आहे, त्यांना काय मदत मिळणार, असा प्रश्न वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असताना त्याची घोषणा केली नाही. कर्जमाफी करणार करणार फक्त तारीख पे तारीख सरकार सांगत आहे. पण नेमकी शेतकरी कर्जमाफी कधी देणार हे सरकार सांगत नाही’ असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




