अहमदनगर (प्रतिनिधी) | Ahmednagar – आखाड म्हटला की मांसाहार करणार्यांना पर्वणीच. मटन रस्सा आणि भाकरी. तांबडा.. पांढरा रस्सा. कंदुरी. असले फ़क़्त शब्द ऐकले तरी मांसाहारी खावय्यांच्या तोंडात पाणी येतेच..पण आता करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तंगीमुळे आखाड साजरा करण्यासाठी अनेकांनी हात आखडता घेतला आहे. तसेच गावागावांत होणार्या आखाड पार्ट्या आणि कंदुरी जेवणावरही निर्बंध आले असल्याने खवय्यांची मोठी गोची झाली आहे.
आषाढ महिना मोठा विसंगतीपूर्ण व विरोधाभासाने व्यतित केला जातो. आषाढ महिन्याचा सुरुवातीचा पंधरवडा टाळ-मृदंग-पालखी-वारी-एकादशी अशा भक्तिरसात चिंब न्हालेला असतो. तर शेवटचा पक्ष अनेक ग्रामदेवतेला सामिष नैवेद्य दाखवण्यात, अपेयपान पिण्यात जातो. त्यानिमित्ताने घरोघरी कोंबडे-बकरे कापली जातात. या मांसभक्षणाचा अधिकृत समारोप गटारीच्या दिवशी असल्याने मांसबाजारात, मच्छीमार्केटमध्ये व मद्याच्या दुकानांत कोटींची उलाढाल होत असते. पण यंदा चित्र वेगळेच आहे. यंदा टाळ-मृदंग-पालखी-वारी दिसलीच नाही. आता आखाड पार्ट्यांचीही तीच गत झाली आहे.
आषाढनंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असतो. या काळात अनेकजण मांसाहार करत नसल्याने आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार म्हणजे ‘आखाड पार्टी’चाच दिवस! आखाडाच्या हंगामात सगळीकडे मटन-भाकरीवर ताव मारला जातो. इतरही बडदास्त ठेवली जातेे. पंचक्रोशीतले सर्व सगेसोयरे जेवणासाठी येतात. अशाप्रसंगी दारूची व्यवस्था केली जाते. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.
अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देतात. शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती दिली जाते. पण आता करोनाचा वाढता धोका आणि जमावबंदीचा आदेश तसेच हॉटेल्स बंद, जनावरांचे बाजार बंद त्यामुळे आखाड साजरा करण्यावर नियंत्रण आले आहे. तसेच गावागावांत लोकदेवता म्हसोबाला नैवद्य दाखवून कंदुरीचा बेत केला जातो. त्याला करोनाने चाप बसला आहे. ज्या ज्या गावात आगामी काळात निवडणुका होणार आहेत. तेथेही ‘कंदुरी’चा बेत कसा अंमलात आणायचा यावर खल सुरू आहे.