मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मतदारांच्या सोयीसाठी मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली आहे.
मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता, आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील.
प्रवेशद्वाराजवळ सोप्या बॉक्स किंवा पोत्यांद्वारे ही सुविधा दिली जाणार असून मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात. मतदान गुप्ततेचा नियम यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे. प्रचाराच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे.