अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar
ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यात जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून यश येत असून जिल्ह्यात यावर्षी 300 जलस्रोतातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सालीमठ म्हणाले, गतवर्षी 108 नदी, नाले आणि प्रकल्पांमधून 23 लक्ष घनमीटरपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला आहे. या कामांमधून 6 हजार 262 सघमी पाणी साठवण क्षमता तर 1 हजार 44 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि शेतीसाठी होत आहे.
नदी, नाले, तलाव गाळमुक्त करण्याच्या या मोहिमेत लोकसहभाग महत्त्वाचा आहे. काढलेला गाळ शेत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने ग्रामस्थांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलसंवर्धनाचे महत्व गावागावात पोहोचवावे आणि आपले गाव टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून जलसंवर्धनाद्वारे ग्रामीण भागात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होत आहे. या योजनांची उपयुक्तता लक्षात घेता प्रशासनातर्फे मोहीम स्तरावर योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे श्री.सालीमठ म्हणाले.