Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमान्सूनचा वेगाने प्रवास सुरु; नाशिक, नगरमध्ये आगमन कधी होणार?

मान्सूनचा वेगाने प्रवास सुरु; नाशिक, नगरमध्ये आगमन कधी होणार?

पुणे । Pune

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मजल मारली आहे. ‘रेमल’ चक्रीवादळ आणखी तीव्र झाले असून ते पश्चिम बंगाल आणि बांगला देशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वादळ शमल्यानंतर मान्सूनची पुढील दिशा ठरणार असल्याचे हवामान विभागाचे मत आहे. यातच शुक्रवार दि. ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रेमल चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. कोलकातामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ येत्या काही तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल आणि २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहोचेलेले असेल. रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ २१ तासांसाठी बंद केला आहे. रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कोलकाता विमानतळावरून सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. याशिवाय डझनभर मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओदिशा आणि प. बंगाल अशा दोन राज्यांना या वादळाचा फटका बसणार असल्याने आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सर्व आपात्कालिन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक नगरमध्ये आगमन कधी होणार?

गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. ३१ मे दरम्यान केरळामध्ये, तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. तसेच, १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात मान्सूनचे आगमन होऊ शकते.

हवामान खात्याने सांगितल्यानुसार, मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाले तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व त्यांच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तिथे लवकर होऊ शकते. महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या