नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे दरड पडून ब्रिज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरिक आणि कुर्सियांग यांना जोडणारा दुदिया आयर्न ब्रिज कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि सिक्कीम जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कालिम्पोंगमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. दार्जिलिंग जिल्ह्याला भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटनांनी मोठा फटका बसला आहे. जलपाईगुडी, सिलीगुडी, कूचबिहारमध्ये पूरस्थिती झाली आहे. पावसामुळे पर्यटन केंद्र बंद करण्यात आली आहेत. सरकारी अधिकार्यांच्या अंदाजानुसार, पावसाची स्थिती अन् भूस्खलनामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मिरिक आणि कुर्सियांग यांना जोडणारा दुदिया आयर्न ब्रिज कोसळल्यामुळे दोन्ही शहरांमधील संपर्क तुटला आहे. कुर्सियांगजवळील नॅशनल हायवे 110 वर हुसैन खोलामध्येही दरड कोसळली असून, सिलीगुडी आणि दार्जिलिंगमधील महामार्ग बंद झाला आहे.
उत्तर बंगालमध्ये सततच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील मिरिक येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर दुधिया लोखंडी पुलाचा एक भाग वाहून गेल्याने सिलीगुडी आणि मिरिक यांचा संपर्क तुटला आहे. कार्सियांग आणि कालिम्पॉंग येथेही भूस्खलन झाले आहे. पाऊस, भूस्खलन आणि त्याच्याशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यातही अडचणी येत आहेत.




