Sunday, June 8, 2025
Homeअग्रलेखफक्त दंड वसुलीने करोना संकट टळणार का?

फक्त दंड वसुलीने करोना संकट टळणार का?

आज जागतिक आरोग्य दिवस. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह सगळ्या देशांनी यलो फिव्हर, प्लेग, कॉलरा अशा साथींच्या महामारीशी यशस्वी सामना केला आहे.

- Advertisement -

पोलिओ, देवी असे हजारो बालकांचा जीव घेणार्‍या रोगांचे नामोनिशाण देखील जगात आढळत नाही. सध्या सगळ्या जगाची करोनाशी लढाई सुरु आहे. दरवर्षी जागतिक आरोग्य दिनाची एक संकल्पना ठरवली जाते. त्यानुसार वर्षभर कार्यक्रम राबवले जातात. ‘चला घडवू या चांगले आणि निरोगी जग’ ही यावर्षीची संकल्पना आहे. याच काळात भारतातील महाराष्ट्र राज्यासह काही राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही तसे स्पष्ट केले आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांच्या एकूण संख्येच्या 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत असल्याचे सांगितले जाते.

दुसर्‍या लाटेत तरुण आणि लहान मुलेही संसर्गाला बळी पडत आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालानुसार 31 मार्चपर्यंत राज्यातील 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या 87 हजारांपेक्षा जास्त मुलांना लागण झाली आहे. तसेच 11 ते 20 वयोगटातील पावणेदोन लाखांपेक्षा जास्त तरुणांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातील सामान्य रुग्णांचा आकडाही वेगाने वाढत आहे. अशा संवेदनशील काळात जनता आणि प्रशासन यांच्याकडून अधिक समंजस आणि परिपक्व वर्तनाची अपेक्षा आहे. तथापि वास्तवात सगळ्यांनीच शहाणपणा खुंटीला टांगून ठेवायचे ठरवले असावे का? निर्बंधांना न जुमानता वागायचे असे लोकांनी आणि बुद्धीचा वापर न करता निर्बंध लादायचे असे प्रशासनाने ठरवले असावे का? सरकारने सगळ्या यात्रा-जत्रांवर बंदी घातली आहे. तरीही वाई तालुक्यातील बावधन येथील भैरवनाथाची बगाड यात्रा जल्लोषात पार पडली.

हजारो गावकरी यात्रेत सामील झाले होते असे सांगितले जाते. गेल्या वर्षीही बंदी मोडून ग्रामस्थ यात्रेत सहभागी झालेच होते. राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. येथील एका रुग्णालयातील करोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. तथापि करोना रुग्ण असल्याने रुग्णालयाने नियमानुसार नकार दिला. त्यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी वाद घातला. स्वागत कक्षातील साहित्याची मोडतोड करून त्याला आग लावली. असे वाट्टेल तसे वागून आणि निर्बंध न पाळून आपणच करोनाला आमंत्रण देत आहोत. संसर्ग झाला तर सरकार फार तर उपचार करण्याची जबाबदारी घेईल पण परिणामांची जबाबदारी मात्र वेड्यासारखे वागणार्‍यांनाच घ्यावी लागेल. करोनाचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम त्यांनाच सहन करावे लागतील हे लोकांना का कळत नाही? सरकार दरबारीही फारसे वेगळे काही घडत नसावे. राज्य सरकारने अनेक नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार कामगार, दुकानातील सेवक, वृत्तपत्र विक्रेते, पार्सल पोहोचवणारे, रिक्षा आणि टॅक्सी चालक अशा प्रकारच्या सेवा देणार्‍या अनेकांना दर पंधरा दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

न करणारांना दंडाचा इशारा दिला आहे. इतका हास्यास्पद निर्णय घेऊ शकणार्‍या सरकारी यंत्रणेला काय म्हणावे? नोकरी जाण्याच्या अथवा दंडाच्या भीतीने लोक चाचणी करून घेतीलही पण तेवढ्या चाचण्या करण्याची यंत्रणेची क्षमता तरी आहे का? सद्यस्थितीत राज्यात दररोज सरासरी दीड ते दोन लाख चाचण्या केल्या जातात असे सांगितले जाते. तरीही नाशिकसह अनेक शहरांमध्ये चाचण्या झालेल्या रुग्णांचे हजारो अहवाल प्रलंबित का आहेत? नवीन नियमानुसार चाचण्यांची संख्या अजून वाढली तर चाचण्या घेणारी यंत्रणा निश्चितच कोलमडेल. असे हास्यास्पद नियम सरकारी यंत्रणेतील लोक तरी पाळू शकतील का? ‘अती शहाणा त्याचा बैल’ नेहेमी रिकामाच असावा का? जे नियम पाळताच येणार नाहीत असे नियम फक्त दंड वसुलीसाठी केले जातात असा जनतेचा समज झाला त्यात चूक काय? पाळण्यास अशक्य असे नियम करा आणि ते मोडले म्ह्णून दंड वसूल करा असा तर सरकारचा इरादा असावा का? अचानक उदभवलेल्या अनपेक्षित संकटाचा सामना करताना काहीवेळा सर्वांगीण विचार होऊ शकत नाही असे घडू शकते. तथापि गेले वर्षभर थैमान घालणार्‍या करोना संकटाबद्दल वर्षभरानंतरही असे हास्यास्पद निर्णय कसे घेतले जाऊ शकतात? करोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करता करता यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. यंत्रणेचे अपयश झाकून ठेवून फक्त लोकांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग हा एकूण सरकारी कारभाराचा खाक्या बनला आहे का? खरे तर करोनासारख्या अभूतपूर्व संकटाचा सामना करताना जनतेला शहाणे करून सोडावे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.

मात्र त्याऐवजी दंडवसुली करून सरकारची कार्यक्षमता सिद्ध होणार का? लोकशाही पद्धतीच्या सरकारकडून इतके हास्यास्पद निर्णय घेतले जाणे हा सरकारमध्ये पुरेसे शहाणपण नसल्याचा पुरावा नाही का? यामुळे करोना किती आटोक्यात येईल ते माहित नाही पण इतक्या संवेदनशील काळातही यंत्रणेत एकवाक्यता, परस्पर समन्वय नाही आणि त्यामुळे हातघाईची परिस्थिती हाताळण्यात यंत्रणेला नेहेमीच अपयश येते एवढे मात्र नक्की सिद्ध होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : माजी आमदार मुरकुटे, छल्लारे यांनी समर्थकांसह हाती घेतले ‘शिवधनुष्य’

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अनेक दिवसांपासूनच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला काल अखेर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी समर्थकांसह आपले नातू नीरज मुरकुटे यांना घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश...