नाशिक | प्रतिनिधी
द्वारका चौकातील मध्यभागी मोठ्या प्रमाणावर पावसामुळे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
सुमारे ५० कर्मचाऱ्यांची विशेष टीम यामध्ये कार्यरत असून, आधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने खड्डे बुजवले जात आहेत. काल सकाळपासूनच हे काम वेगाने सुरू असून वाहतूक सुरळीत राहील, यासाठी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिक शहराचा प्रवेशद्वार असलेला द्वारका चौकात अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. नाशिककरांना सतत झळा सहन कराव्या लागलेल्या या ठिकाणी अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सातत्याने या समस्येकडे लक्ष दिल्याने द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागला आहे. येथील वाहतूक बेट हटवल्यानंतर त्वरित अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाल्याने द्वारका चौकातील वाहतूक बेट हटवण्यात आल्यानंतर परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात आली. यामुळे रस्त्याची रुंदी वाढली असून वाहनांची वहनक्षमता पूर्वीच्या तुलनेत अधिक झाली आहे. तर वाहतूक बेट हटवल्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल आधुनिक यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून वाहतूक पोलिसांची संख्याही वाढविण्यात आली आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतही वाहनांची गती सुरळीत झाली आहे.
पोलिसांची सततची उपस्थिती आणि कार्यक्षम नियंत्रणामुळे चोख वाहतूक व्यवस्थापन दिसून येत आहे. मात्र वाहतूक बेट काढल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या खड्ड्यांची मालिका निर्माण झाली होती. तसेच मध्यभागी साचणारे पाणीही वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरले होते. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीस विलंब झाला. मात्र आता पाऊस कमी झाल्याने नाशिक महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीचा प्रयत्न सुरु केला असून खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
रात्रीच्या वेळेत काम करावे
शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेल्या द्वारका चौकात सुरु असलेल्या कामांमुळे काल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व निर्माण झाली होती. सकाळपासूनच काम सुरू असतानाच रस्त्यांची अडथळा झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासनाने अशा कामांसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज असून रात्रीच्या वेळी अशी कामे केल्यास त्याचा परिणाम दिवसाच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार नाही. कारण द्वारका हे शहरातील महत्वाचे वाहतूक केंद्र आहे.
गेली अनेक वर्षे द्वारका चौक हा प्रवासाचा डोकेदुखी ठरला होता. मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन व आ. फरांदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन विशेष लक्ष दिल्याने हा बदल झाला, त्याचे खरेच कौतुक वाटते. अतिक्रमण हटवणे आणि सिग्नल कार्यान्वित होणे ही दोन महत्वाची पावले होती. आता प्रशासनाने येथील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने समाधानकारक दृश्य निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती कायम राहावी – शकील शेख (व्यावसायिक, द्वारका)




