अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणार्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे युडीआयडी कार्ड, तसेच या कर्मचार्यांनी सेवेसह अन्य योजनांचा घेतलेला लाभ याबाबत राज्य दिव्यांग विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या सर्व कर्मचार्यांपैकी असणारे दिव्यांग कर्मचारी व त्यांचे प्रमाणपत्र युडीआयडी याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहे.
मुंडे यांच्या आदेशानंतर नगर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचारी व त्यांच्या प्रमाणपत्रासह युडीआयडीची पडताळणी करण्याचा निर्णया घेतला आहे. दरम्यान, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन तीन टप्प्यातील अॅक्शन प्लॅन तयार करणार असून त्यानूसार जिल्हा परिषदेच्या 15 ते 16 हजार कर्मचार्यांपैकी पाच टक्के नेमणुकीस असलेल्या कर्मचार्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाला पाठवणार आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शिक्षकांनी बदलीत लाभ घेण्यासाठी आजारपणासह विविध आजारपणाचे कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतला असून अशा सर्व शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू असतांना आता पुन्हा दिव्यांग आयुक्त मुंडे यांच्या आदेशाची भर पडल्याने आता जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचार्यांची तीन टप्प्यात एकदम दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडीची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील आठ दिवसात याबाबतचा अॅक्शन प्लॅन तयार कण्यात येणार आहे.
यात पहिल्या टप्प्यात दिव्यांग असणार्या कर्मचार्यांचा ऑनलाईन युडीआयडी काढून घेणे, दुसर्या टप्प्यात ज्या कर्मचार्यांकडे हा आयडी आहे, त्यांचे प्रमाणपत्र याची तपासणी करून घेणे (यात ज्या ठिकाणाहून संबंधीत प्रमाणपत्र मंजूर झालेले आहे, त्यांच्याकडे संबंधीतांने दिव्यांग तपासणीसाठी कधी केसपेपर काढलेल्या आहे. त्याच्या दिव्यांगाची तपासणी कधी झालेली आहे. ही तपासणी करणारे डॉक्टर यांचे रेकॉर्ड संबंधीत जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे की नाही) याची खात्री करण्यात येणार आहेत.
त्यानंतर डोळ्यांनी दिसणारे दिव्यांग सोडून उर्वरित सर्व दिव्यांगाची नव्याने जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. यात दिव्यांग प्रमाणपत्राचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. लवकर हा अॅक्शन प्लॅन तयार झाल्यावर त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात साधारणपणे 15 ते 16 हजार कर्मचारी कार्यरत असून त्यातील दिव्यांग सवलतीलचा फायदा घेणारे 750 कर्मचारी अथवा त्याहून अधिक असतील, या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.





