अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुढील महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 14 जुलैला प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. या दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेची माहिती गोपनीय ठेवण्यात यावी. राजकीय व्यक्ती अथवा अन्य व्यक्तींना त्या प्रभाग रचनेची माहिती मिळता काम नये, प्रारूप प्रभाग रचनेचा तयार करताना गोपनियता पाळावी, असे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे काम पाहणार्या अधिकारी- कर्मचार्यांना दिले आहेत. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा दिला आहे.
मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषद गट आणि गणाची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डवले यांनी सविस्तर आदेश काढलेले आहेत. या आदेशात प्रभाग रचना कार्यक्रम तयार करताना कराव्याच्या.
उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. यात जिल्हा परिषद गटांची संख्या, गणांची संख्या, प्रभागाची संख्या किती असावी, याबाबत सविस्तर आदेश दिलेले आहेत. या कामी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी अथवा त्या दर्जाचे अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधीत तहसीलदार आणि अन्य अधिकारी संगणक ऑपरेट यांची समिती तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत यात प्रभाग रचना तयार करताना सर्व संबंधीत अधिकार्यांनी गोपनियता पाळावी. प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द होण्यापूर्वी त्याबाबत राजकीय पक्षाचे व्यक्ती अथवा अन्य व्यक्तींना माहिती देण्यात येवू नयेत, तसेच प्रभाग रचनेचे काम पाहणार्या अधिकारी- कर्मचार्यांवर कोणीही दबाव टाकू नयेत असे स्पष्ट केलेले आहे.
गावोगावी खलबते सुरू
जिल्हा परिषद निवडणूका टप्प्यात येणार असल्याचे दिसताच आतापासून ग्रामीण भागात नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी खलबते सुरू झाली आहे. साधारपणे दिवाळीच्या आतबाहेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार असल्याची शक्यता आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आधी प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर निवडणूकांची तारीख जाहीर होणार असल्याने ग्रामीण भागात आतापासून हुरूप वाढले आहे.
गट-गणाच्या लोकसंख्येबाबत सुचना
जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समितीच्या गणाची रचना करताना त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या भागिले त्या गटात अथवा गणात देय सदस्य संख्या यांच्या प्रमाणात असावी. यात सरासरी 10 टक्के वाढ की किंवा घट ठेवता येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत लोकसंख्या ही किमान अथवा कमाल मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त असल्यास त्याची कारणे प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.