संगमनेर |वार्ताहर| Sangamner
दुपारची वेळ, अचानक झोपडीला आग लागली आणि आगीचे लोळ बाहेर पडू लागले. पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ या ऊक्तीप्रमाणे शेजारील तरुणाने जीवाची पर्वा न करता थेट छपरात घुसून झोळीत झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा जीव वाचवला आहे. ही थरारक घटना संगमनेर तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी घडली आहे. या धाडसी तरूणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जांबुत बुद्रुक गावात सिंधूबाई शरद वारे व त्यांची मुलगी ताई वारे या दोन्ही मायलेकी छोट्याशा छपरात राहत होत्या. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.
मंगळवारी ताई वारे या कामाला बाहेर गेल्या होत्या. तर घरी आई सिंधूबाई या होत्या. त्यांनी कार्तिक व अर्जुन या दोन्ही नातवांना झोळीत झोपून त्या कपडे धूण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अचानक त्या राहत असलेल्या झोपडीला आग लागली आणि आगीचे लोळ दिसू लागले. शेजारीच असलेल्या रवींद्र बर्डे या तरूणाने आपल्या जीवाची पर्वा न करता थेट झोपडीच्या दिशेने धाव घेतली आणि दोन्ही चिमुकल्यांना झोळीतून सुखरूप बाहेर काढले.
यावेळी आगीचे लोळ असल्याने यामध्ये रवींद्र हा तरूण थोड्याफार प्रमाणात भाजला देखील आहे. दरम्यान या तरूणाने धाडस केले नसते तर आज मोठी घटना घडली असती. या घटनेमध्ये छपरात असलेले कपडे, धान्य, भांडे आदी संसारोपयोगी साहित्य अक्षरशः जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती समजताच बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, माजी सरपंच उत्तम बुरके, पोलीस पाटील गंगाधर शिरसाठ यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या आगीत वारे कुटुंब संपूर्ण उघड्यावर आले असून त्यांना खर्याअर्थाने मदतीची गरज आहे.