नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अधिनस्त असलेल्या ३ संवर्गांतील ५५३ सेवकांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे दोन वर्षाचे ३० सभासदांचे आदेश व स्थायित्वचे ८ आदेशही मंजुर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत विभागाने सेवकांचे महत्वाचे प्रशासकीय विषय मार्गी लावल्याने सेवकांमध्ये समाधान व्यकत करण्यात येत असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ग्रामसेवक संघटनेकडून आभार मानण्यात आले.
जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत सेवकांना शासन निर्णयानुसार सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत १० वर्ष सेवा झाल्यावर पहिला, २० वर्ष सेवा झाल्यावर दुसरा तर ३० वर्ष सेवा झाल्यावर तिसरा लाभ देण्यात येतो. त्यानुसार ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी संवर्गात कार्यरत असलेल्या सेवकांना सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला, दुसरा लाभ मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामसेवक संवर्गातील ४२५ जणांना १० वर्षाचा लाभ, ३८ जणांना २० वर्षाचा लाभ तर ६ जणांना जुना १२ वर्षाचा लाभ,एकास जुना २४ वर्षाचा लाभ मंजुर करण्यात आला आहे.
ग्रामविकास अधिकारी संर्वगातील ३३ जणांना १० वर्षाचा लाभ, १८ जणांना २० वर्षाचा लाभ , ६ जणांना ३० वर्षाचा लाभ, २ जणांना जुना १२ वर्षाचा लाभ तर २ जणास जुना २४ वर्षाचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी संवर्गातील १६ जणांना १२ वर्षाचा जुना लाभ, २ जणांना १० वर्षाचा लाभ, २ जणांना ३० वर्षाचा लाभ, २ जणांना जुना १२ वर्षाचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. याचबरोबर आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे दोन वर्षाचे ३० सभासदांचे आदेश, स्थायीत्वचे ०८, परिविक्षाधीन कालावधीचे १, संगणक अर्हतेचे १, निवृत्ती वेतनाचे १ निलंबित कर्मचारी पुर्नस्थापनाचे २७ असे एकुण ५८० प्रकरण मंजुर करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत विभागाची सुत्रे हाती घेतल्यापासून रविंद्र परदेशी यांनी सेवकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामाचा सपाटा सुरु ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दिड महिन्यांपासुन ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांनी परिश्रम घेऊन महत्वाचे प्रश्न मार्गी लावले असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी देखील यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
दरम्यान, ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव आदिंचा सत्कार करुन आभार व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष. कैलास वाघचौरे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र शेलार, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद ठाकरे उपस्थित होते.
आस्थापनाविषयक विषय मार्गी लावण्यावर भर– लीना बनसोड
जिल्हा परिषदेचे काम करताना जिल्हा ते ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या विविध सेवकांचे आस्थापनाविषयक विषय मार्गी लावणे महत्वाचे आहे. कोणतेही प्रशासकीय विषय प्रलंबित राहु नये यासाठी सर्व खातेप्रमुखांना सुचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कामकाज करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींचा निपटारा करण्यासाठी एक ते दिड महिन्यापासून परिश्रम घेऊन, शासन निर्णयांचा अभ्यास करुन सेवकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या नियम निकषानुसार सर्वाना लाभ मंजूर करण्यात आला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावर काम करणाऱ्या या सेवकांचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावला आहे.




