धुळे | प्रतिनिधी
शहरात उष्णतेने कहर केला असून शुक्रवारी (2 मे) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून तापमान 43 अंशांवर स्थिर होते. मात्र शुक्रवारी त्यात आणखी एक अंशाची भर पडली आणि सूर्याने अक्षरशः आग ओकली. सकाळी नऊच्या आतच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. परिणामी, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. नागरिक डोक्यावर रुमाल, चेहर्यावर गॉगल लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत, तर काहींनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणेच टाळले आहे. तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. घशालाही कोरड पडत असल्यामुळे शीत पेयांना मागणी चांगलीच वाढली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान 42-43 अंशांच्या घरात फिरत आहे. उकाड्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच त्रास जाणवत आहे. दुपारच्या वेळेस बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणे ओस पडलेली पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना शक्यतो उन्हात न जाण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून बचाव करणारे उपाय करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.