
पिंपळगाव ब. | प्रतिनिधी Pimpalgaon Basvant
पावसाळ्यात शेतात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर बंद होणारा शेतातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी खासदार भास्करराव भगरे यांनी केली.
याबाबत महावितरण मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत मुख्य अभियंत्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीत शेतकर्यांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गावठाण फिडरच्या धर्तीवर शेतांसाठीही २४ तास वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी आणि प्रत्येक सबस्टेशनवर एसडीटी ट्रान्सफॉर्मर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता लटपटे यांनी दिले.
ज्या भागात एसडीटी ट्रान्सफॉर्मर वारंवार ट्रिप होतात अथवा बिघाड होतो, त्या ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणार्यांवर कारवाई करण्यात येईल. महावितरण कर्मचार्यांकडून कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवरही कारवाई केली जाईल, असे लटपटे यांनी सांगितले. महावितरणवरील भार कमी करण्यासाठी सोलर स्मार्ट स्कीमचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
जे.पी.सी.एल ग्राहकांना अडीच हजार रुपये भरून ६० हजार रुपये किमतीची १ के.व्ही.ए सोलर सिस्टीम मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. एस.सी, एस.टी प्रवर्गातील ग्राहकांना पाच हजार रुपयांत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी ७ ते १० अनावश्यक वीजवापर टाळून नागरिकांनी वीजबचतीस सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीस महावितरण अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.




