मध्य प्रदेश | Madhya Pradesh
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमधून आवाज आला आणि अचानक गाड्या बंद पडल्या. कुणाला काहीच समजेना, एक नाही तर एकामागे एक १९ गाड्या बंद पडल्या आहेत. जेव्हा या गाड्या तपासल्या तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहने अचानक बंद पडल्याचे पाहायला मिळाले. तसेच या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे. या घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंपावर मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमके काय घटना घडली?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा ताफा रतलाम येथे एमपी राईज 2025 कॉन्क्लेव्हसाठी रवाना झाला होता. त्यामुळे, या ताफ्यातील १९ इनोव्हा कारमध्ये डिझेल भरण्यासाठी ढोसी गावातील पेट्रोल पंपावर त्या कार थांबल्या होत्या. मात्र, येथील पंपावर डिझेल भरल्यानंतर काही वेळातच या कार पुढे जाऊन अचानक बंद पडल्याची घटना घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कार अचानक बंद पडल्याने प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, कारमधील डिझेल खाली करण्यात आले असता पेट्रोलच्या टाकीत पाणी आढळून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे, पेट्रोल पंपावरच गाड्यांचे इंधन टँक खोलून तपासणी करण्यात आली. यावेळी, पेट्रोल पंपाला गॅरेजचे स्वरुप प्राप्त झाले होते. रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ताफ्यातील सर्व गाड्या अचानक बंद पडल्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नियोजित कार्यक्रमाला वेळेत पोहोचवण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ताफ्यातील काही गाड्या चालक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून गाड्या ढकलण्यात येत असल्याचे दिसत आहे.
याच पेट्रोल पंपावरून एका ट्रकमध्येही सुमारे २०० लीटर डिझेल भरण्यात आले होते. तो ट्रकही काही अंतरावर जाऊन बंद पडला. अधिकाऱ्यांनी तात्काळ भारत पेट्रोलियमच्या एरिया मॅनेजरला बोलावून घेतले. एरिया मॅनेजरने पावसाळ्यामुळे टाकीत पाणी झिरपण्याची शक्यता व्यक्त केली.
या घटनेनंतर प्रशासनाने ढोसी गावातील हा पेट्रोल पंप सील केला असून पुढील तपास आणि चौकशी करण्यात येत आहे. नायब तहसीलदार आशीष उपाध्याय, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी आनंद गोरे, यांच्यासह इतरही अधिकारी पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यानंतर, गाडीचे इंधन टँक खोलण्यात आले, त्यावेळी या टँकमध्ये २० लिटर डिझेलमध्ये १० लिटर पाणी असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे सर्वच गाड्यांची हीच अवस्था होती.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील एका कार चालकाने सांगितलं की, “वाहने इंदूरहून रतलामला येत होती आणि पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबली होती. वाहनांमध्ये डिझेल भरल्यानंतर काही वाहने निघून गेली आणि १ किमी प्रवास केल्यानंतर अनेक वाहनांत अचनाक बिघाड झाला.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




