अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या 2 हजार 26, तर शहरातील आठवी ते बारावीच्या 96 अशा एकूण 2 हजार 122 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.
करोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे करोनाचे नियम पाळून येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहावे लागणार असल्याने दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.
शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी, तर ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीणमध्ये ज्या जिल्ह्यात करोना प्रादूर्भाव कमी आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू आहेत. जिल्ह्यात आठवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या 35 हजार 294 असून पाचवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या 6 लाख 2 हजार 513 आहे. यातील किती विद्यार्थी शाळेत येणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष राहणार आहे. यासह विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात येणार आहे.