जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जून महिन्यातील दमदार ओपनिंगनंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यात 72 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात 50 टक्के पाऊस कमी झाला असून जिल्ह्यात 28 टक्के पेरण्या अद्यापि रखडल्या आहेत. दररोज दुपारपर्यंत उन्हाचा तडका देत आकाशात जमणारे ढग सायंकाळी हुलकावणी देत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढत आहे.
जिल्ह्यातील चार तालुक्यात पाऊस कमी आहे. काही भागात अद्याप पेरण्यांना सुरुवात नाही. ज्या भागात एका फुटापर्यंत जमिनीत ओल नाही. तेथे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. मूग आणि उडदाच्या पेरणीची तारीख बाद झाली आहे. त्यामुळे मूग आणि उडिद पिकाखालील क्षेत्रात सोयाबीन, तूर कापूस या पिकांचा विचार करावा. मूग आणि उडिद उशिराने घेऊ नये.
संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीे
पेरणीला उशीर झाला असल्यास 15 जुलै या कालावधीतील कपाशीची पेरणी करावयाची असल्यास लवकर येणार्या वाणाची लागवड करावी. सरळ वाण असल्यास बियाण्याचे प्रमाण 20 टक्के अधिक घ्यावे. कपाशीमध्ये आंतरपिकाचे नियोजन करावे. सोयाबीन, ज्वारी मध्येही लवकर येणार्या वाणाची निवड करावी. बियाण्याचे प्रमाण 20 ते 25 टक्कयांंनी वाढवावे.
अनिल भोकरे , उपसंचालक, कृषी विभाग,जळगाव
दरम्यान, पेरण्या आटोपलेल्या आणि खोळंबलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांना सध्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस न झाल्यास 72 टक्के पेण्या वाया जाणार असून शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत असल्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
गेल्या वर्षी पावसाच्या खंडामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, यंदा जिल्ह्यात 72 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.तर 28 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यातील पाचोरा, रावेर, यावल तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. मात्र,धरणगाव, चोपडा आणि अमळनेर या तालुक्यात जूनअखेरपर्यंत 50 टक्के पाऊस कमी असल्याने काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. तर अनेक तालुक्यात पेरण्या आटोपून पिकांचा अंकूर वर आले आहेत. मात्र पाऊस नसल्याने पिके सुकत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.
उडीद, मुगाच्या पेरणीसाठी 30 जून ही अखेरची तारीख होती. त्यामुळे आता या पिकांच्या पेरणीचा कालावधी गेला आहे. कृषी अधिकार्यांच्या माहितीनुसार, सरासरी पुढील चार ते पाच दिवसात संपूर्ण जिल्ह्यात पाऊस न झाल्यास 72 टक्के पेरण्या पुन्हा कराव्या लागणार आहे.