श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अहमदनगर करमाळा या नविन रेल्वे मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी व्यक्त केला.
अनेक रेल्वे मार्गावरील वाढता ताण व होणारा त्रास लक्षात घेऊन अनेक मार्गांवर जलद प्रवासासाठी काही रेल्वे मार्ग तयार करून तेे जोडण्याचा महत्त्वाचा विचार रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. अहमदनगर आणि करमाळा हा रेल्वे मार्ग करण्याचा विचार असून तो सोलापूर दौंड या रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. मनमाड रेल्वे मार्गावरून सोलापूरकडे धावणार्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वे गाड्या दौंड रेल्वे जंक्शनवर न जाता या रेल्वे मार्गावरून जातील, त्यामुळे वेळेची बचत होईल व आर्थिक बचत होणार आहे.
नवी दिल्ली बेंगलोर कर्नाटक एक्सप्रेस, अहमदाबाद बेंगलोर, शिर्डीहून सुटणार्या म्हैसूर, चेन्नई आदी रेल्वे गाड्या या रेल्वे मार्गावरून जातील. भविष्या अहमदनगर रेल्वे स्टेशन दौंड रेल्वे जंक्शनपेक्षा मोठे होणार आहे.नियोजीत नगर परळी रेल्वे मार्ग करमाळा हे दोन रेल्वे मार्गदेखील जोडले जातील तसेच कल्याण, मुरबाड, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे हे दोन प्रस्तावित रेल्वेमार्ग देखील जोडले जातील व भविष्यात नव्याने जादा रेल्वे सुरू होतील, असे श्रीगोड यांनी सांगितले.
नविन जादा रेल्वे मार्गाला 15 हजार कोटी रुपयांचे खर्च अपेक्षीत आहे. मान्यता मिळाल्यास सन 2022 ते 2025 पर्यंत हा रेल्वे मार्ग होऊ शकतो. नविन रेल्वे मार्गातील जमिनी संपादन करताना पर्यावरणाचा धोका देखील उभा राहणार नाही व औद्योगिक विकासाला नविन दिशा मिळेल. या नविन रेल्वे मार्ग कर्जत तालुक्यातील मार्गावरून जाण्याची दाट शक्यता आहे. हा निर्णय लवकरच घेण्यात यावा, याकरिता लोकप्रतिनीधीमार्फत लक्ष वेधणार असल्याचे रणजित श्रीगोड यांनी सांगितले.