पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा परिसराच्या तीर्थक्षेत्र विकासाकरिता निधी देऊन पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
ना. ठाकरे रविवारी संगमनेर येथे आले असता पुणतांबा शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी शिवसैनिकांसह त्यांची भेट घेतली. पुणतांबा परिसरातील विविध प्रश्नांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. पुणतांबा गावाचा तीर्थक्षेत्रात समावेश होऊन पंचवीस वर्षे झालेले आहेत. मात्र या तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळाली नाही. वर्षभरात दोन यात्रा व दैनंदिन भाविकांची मोठी उपस्थिती असते. याठिकाणी काही सुविधा आणि रस्तेही अर्धवट असल्याने भाविकांना अडचणी येतात.
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी निधी द्यावा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित व्हावे यामुळे शिर्डीला येणार्या भाविकांना या ठिकाणाचे पर्यटन करता येईल, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
राहाता तालुक्यातील मोठे गाव व चार तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण मात्र चांगदेव शुगर मिल्स बंद झाल्यानंतर पर्यायी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले नाही. यामुळे परिसरात मोठी बेरोजगारी असून येथे पर्यायी उद्योग आणावा तसेच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्राधान्य दिले जावे अशी मागणीही त्यांनी केली. या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन ना.ठाकरे यांनी दिले.