मुल्हेर | Mulher
महाराष्ट्रातील (Maharashtra) महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये मुल्हेर किल्ल्याचा (Mulher Fort) उल्लेख केला जातो. या किल्ल्याला नुकतेच पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या किल्ल्यावर काही अज्ञात व्यक्तींनी आग (Fire) लावल्याने अचानक वणवा (Forest Fire) पेटल्याची माहिती वनविभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी दिली आहे….
दि. १० एप्रिलला साधारण दोन वाजेच्या सुमारास किल्ल्याच्या उत्तरेकडून आग लागल्याचे सांगितले जात आहे. हा वणवा इतका भयानक होता की त्याचे पडसाद पूर्ण किल्ल्यावर दिसून आले. या वणव्यामुळे जंगल संपत्ती व वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विशेष बाब म्हणजे सलग पाच वर्षांपासून या किल्ल्याचे वनसंवर्धन केले जात आहे. किल्ल्यावर कुठली वृक्षतोड होऊ नये यासाठी वनकर्मचारी सदैव तत्पर असतात. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे वन कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
काही ठिकाणी उंच कडा असल्याने कड्यावरून दगड पडणे सुरु होते. त्यामुळे आग विझवणे अवघड होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्राचा वापर केला जात होता.
वणवा आटोक्यात आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सहाने, विशाल दुसाने, पंकज परदेशी, रवी गांगुर्डे, गौरव अहिरे, बापू भदाने, वसंत अहिरे, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.