संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी काल दुपारी संगमनेर येथे धावती भेट दिली. यावेळी त्यांनी संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली.
डॉ. बी. जी. शेखर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत डॉ. बी. जी. शेखर यांनी माहिती घेतली. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या बाबतही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.
आपण मागील महिन्यात संगमनेर येथे शांतता कमिटीच्या बैठकीला आलो असता या बैठकीस संगमनेर येथील शांतता समितीचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार यांच्यासह कुणीही उपस्थित नव्हते.पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर संगमनेरकर नाराज असल्याचे तेव्हाच आपणास समजले होते, असे त्यांनी बी. जी. शेखर यांना सांगितले. संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यास नव्याने पोलीस अधिकारी देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन अकोले तालुक्यातील कोतुळ येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू करावे, अशी मागणी केली. याबाबतच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देऊन पुढील कार्यवाही साठी राज्य शासनास पाठवली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.