श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मध्य रेल्वेच्या पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस या गाडीस तिकीट तपासणीस नसल्यामुळे आरक्षण बोगीच्या 75 प्रवाशांचे क्षमतेपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे आरक्षण करुन प्रवास करणारांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच आरक्षण व जनरल बोगीमधील शौचालय व बोगी साफ नसल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागली. अनेक बोगीतील सीटस् फाटलेले व त्याला थिगळ जोडलेले कपडे होते. यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करुन तपासणीसांच्या दुर्लक्षतेबद्दल व अनुपस्थितीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडुन होत आहे.
दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्याहुन हावडाकडे जाणारी गाडी नं. 12129 मध्ये बोगी नंबर एस 3 मधुन व दि. 30 ऑक्टोबर 2022 रोजी हावडा-पुणे गाडी नंबर 12130 या गाडीमधुन दुर्ग ते पुणे प्रवास करणारे एस 8 बोगीतून प्रवास करणार्या प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रवासी 2 ते 3 महिने आगोदर पैशाची गुंतवणूक करतात परंतू प्रत्यक्षात मात्र आरक्षण बोगीच्या क्षमतेपेक्षा वेटींग तिकीट घेऊन व साधे तिकीट घेऊन बसणारांची संख्या दुपटीपेक्षा अधिक असतानाही बोगीमध्ये टी. सी. तपासणीसाठी येतच नाही, हे अयोग्य आहे. विना आरक्षणवाले प्रवासी रात्रीच्यावेळी मोकळ्या जागेत झोपलेले असतात, बोगीचे लाईट बंद करुन टाकतात. त्यामुळे आरक्षण करणार्या प्रवाशांना टॉयलेट, बाथरुमला जाता येत नाही व अंधाराचा त्रास होतो, झोपलेले प्रवासी उठतही नाहीत.
रेल्वे प्रशासनाने आरक्षण बोगीत आरक्षण कर्न्फम असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, अशी घोषणा केली होती. या घोषणेची रेल्वे आधिकारीच पायमल्ली करत आहेत. आरक्षण बोगीत वीना आरक्षणवाले प्रवासी बसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, व रात्रीचे वेळी टी. सी. बोगीत असणे आवश्यक आहे. प्रवाशांचे सामान गर्दित चोरी जातात, त्याला जबाबदार रेल्वेच आहे. यासाठी गर्दिच्या हंगामात जादा आरक्षण बोगी जोडाव्यात.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे भाड्यात भरमसाठ वाढ केली आहे. परंतु सुरक्षितता व संरक्षण नाही. टी. सी. बोगीत नाही, हे प्रशासनाचे दुर्लक्षच म्हणावे लागेल. रेल्वे प्रशासनाने रेल्वेत बोगीमध्ये टी. सी., पोलीस राहतील, कोच स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी, मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षतेबद्दल व तिकीट तपासणीस का नव्हते, याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांनी आवाज उठवून रेल्वे प्रशासनाला जाग आणावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.