दिल्ली | Delhi
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची वागणूक समाधानकारक असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याची परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस हे मुक्त होणार आहेत. तर पेरारिवलन हा आधीच या प्रकरणातून मुक्त झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे १८ मे रोजी पेरारिवलन याला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती एल. नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम १४२चा वापर करून हा आदेश दिला होता.