श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गावकी व भावकीच्या वादात न पडता लोकांनी आपापसात भांडणे लावणार्यांपासून सावध राहिले पाहिजे. तसेच गावातील मतभेद व वाद गावातच समन्वयाने मिटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या पुढाकाराने तसेच तालुका विधी सेवा समिती, श्रीरामपूर आणि वकील संघ, श्रीरामपूर तसेच पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अशोकनगर येथे ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये कायदेशीर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी दिवाणी न्यायालयाचे (वरिष्ठ स्तर) न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर) न्यायाधीश एन. के. खराडे यांनी, कामगार कायद्याबाबत मार्गदर्शन केले. सहदिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर) न्यायाधीश श्रीमती प्रियांका पटेल यांनी, आरोपींचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. पी. आर. धुमाळ यांनी महिला विषयक कायद्यांची माहिती विषद केली. तर अॅड. ऋषिकेश बोर्डे यांनी मध्यस्थ कायद्याबाबत माहिती दिली.
यावेळी अॅड. अरिफ शेख, कारखान्याचे व्हा. चेअरमान भाऊसाहेब उंडे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक रामभाऊ कसार, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदिंसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अॅड. उमेश लटमाळे यांनी प्रास्ताविक केले तर अॅड. अतुल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे संचालक सोपानराव राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.