Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंचा कर्नाटक सरकारला इशारा, म्हणाले...

राज ठाकरेंचा कर्नाटक सरकारला इशारा, म्हणाले…

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) प्रश्न चिघळा असून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्राने (Maharashtra) जे काही मिळवले आहे ते संघर्ष करून मिळवले आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असे वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावे असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी काय म्हटले आहे पत्रात?

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं, असे राज ठाकरे यांनी ठणकावले आहे.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या