Thursday, May 16, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये महायुतीत ट्विस्ट; शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज!

नाशिकमध्ये महायुतीत ट्विस्ट; शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज!

नाशिक | Nashik

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून नुकतेच दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील महायुती आणि मविआच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तर महायुतीचा नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसतांनाच आता नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप महायुतीकडून (Mahayuti) अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतीगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : “केंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ…”; संजय राऊतांचा नाशकातून हल्लाबोल

दरम्यान, शांतीगिरी महाराज यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. पंरतु, त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने नाशिकसह (Nashik) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज विकत घेतले होते. याआधी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला.

नेमकं शांतीगिरी महाराज काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेतले होते. त्यावेळी मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर घेऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले होते. यानंतर मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. सध्या माझा अर्ज अपक्ष आहे. माझ्या भक्त परिवारातील जे लोक आहेत त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. ते काय निर्णय घेतील यावर मी महायुतीचा उमेदवार होऊ शकतो. मात्र, आज मी उमेदवारी अर्जात शिंदेंच्या शिवसेनेचे नाव टाकले आहे, असे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या