सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे
मुंबई – देशाची आर्थिक स्थिती खराब आहे आणि त्यात सीएए आणि एनआरसीसारख्या गोष्टी घडत आहेत. सूर्यग्रहणासारखे देशाला ग्रहण लागले आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये गुरुवारी धरणे आंदोलन केलं. यावेळी आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केले.
ते म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाह खोटं बोलत आहेत. आधी संसदेत त्यांनी एनआरसीबद्दल बोललं गेलं होतं. आरएसएसचा हा अजेंडा आहे, हे खोटं बोलतात. याआधी जनगणना झाली आहे. आता कशी करत आहे. आमच्या मोर्चात भटके विमुक्त देखील सहभागी होतील, आम्हाला जाणीव आहे, त्यांच्याकडे कागदपत्र नसतात. भाजपला आता जाणीव होते की रस्त्यावर फक्त मुस्लिम उतरत नाही. तर इतरही घटक उतरत आहे, आर्थिक स्थिती वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे.
विनापरवानगी आंदोलन केल्याने नोटीस
प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलन केल्याने त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली आहे.