नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यातील 102 ग्राम पंचायतींची मुदत येत्या एप्रिल ते जून या कालावधित संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक शाखेने वरील ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या 24 फेबु्रवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
कळवण तालुक्यातील 29, इगतपुरी तालुक्यातील 4, येवला तालुक्यातील 25 व दिंडोरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींची मुदत येत्या काळात संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार वरील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल. सध्या या ग्रामपंचातींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या 15 फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर 15 ते 20 फेबु्रवारी या कालावधित प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादयांवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
हरकती निकाली काढण्यात आल्यानंतर येत्या 24 फेबु्रवारीला 102 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाल्याने एक प्रकारे ग्राम पंचायती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. गत भाजप सरकारने सदस्यांऐवजी थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया अंमलात आणली होती.
मात्र, सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने थेट जनतेतून संरपंच निवड ही प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे आता लोक सदस्य निवडतील. त्यातून सरंपचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत धुराळा उडण्याची शक्यता आहे.