नाशिक । राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. खबरदारीसाठी एमपीएसचीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.
या पत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणार्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणार्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकार्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.