राजापूर । वार्ताहर
येवला तालुक्यातील राजापूर येथे काल दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक सुरु झालेल्या बेमोसमी पावसाने शेतातील कांदा, मका, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अर्धातास झालेल्या या पावसाने शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा व भाव वाढीच्या आशेने ठेवलेला मका भिजला आहे.
दिवसभर उकाड्याने हैराण आणि ढगाळ हवामान नसताना अचानक पावसाला सुरूवात झाल्याने शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. या बेमोसमी पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या राजापूर येथे रांगडा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. काही शेतामध्ये कांद्याच्या पोळी पडलेल्या आहे. काही शेतकर्यांचे गहू, हरभरा, कांदा काढणी सुरू आहे.
अचानक बेमोसमी पावसाने मका व कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या बिकट पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.