नाशिक | प्रतिनिधी
पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी मोठ्या संख्येने नाशिककरांनी रस्त्यांवर गर्दी केलेली दिसून आली. त्यामुळे ‘पुन्हा एकदा काल कमावले आणि आज गमावले’ अशी म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. रस्त्यावरील गर्दी चिंता वाढविणारी असून नाशिककरांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर गर्दी वाढल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी सकाळी दुकाने उघडून दिली होती. मात्र, विविध भागात पोलीस यंत्रणेने वाहन फिरवत पुन्हा दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस तंबी देत असल्यामुळे मोठ्या संख्येने नाशिककरांनी दुकाने बंद केली विनाकारण शहरात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना पोलीस समज देत आहेत. तर अनेक ठिकाणी काहीही कारण नसणाऱ्या नागरिकांना उठ बशा काढण्यास सांगितले जात आहे.
शहरात जमाव बंदीचे आदेश देण्यात आलेले असताना शहर नेहमीप्रमाणे गजबजलेले दिसून आल्यामुळे यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे.