जळगाव | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पोलीस महामार्गावर शनिवारी सकाळी ११ वाजता गस्त घालत असताना मुंबईहून झारखंड येथे जाणार्या चार कालीपिली वाहनातील प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांतील १५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातही त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलीस गस्त घालत होते. या दरम्यान बहिणाबाई गार्डनजवळ मुंबईहून झारखंड येथे जाणार्या मुंबईच्या खासगी चार कालीपिली वाहनांना पोलिसांनी अडवले.
पोलिसांनी चौकशी केली असता ते प्रवाशी झारखंड येथे जात असल्याचे समजले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी चारही वाहने ताब्यात घेतले. त्यांनी या वाहनांमधील १५ जणांची चौकशी केली. हे प्रवाशी कोरोनाच्या भीतीने मुंबई सोडून झारखंड येथे जात असल्याचे समजताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.