महावितरणच्या कार्याचा घेतला आढावा
अहमदनगर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात व राज्यात लाॅकडाऊन करण्यात आले असताना या काळातही राज्यासह जिल्ह्यात महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज असून या लढ्यात महावितरण महत्वाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
महावितरणच्या अहमदनगर मंडळाच्या कार्यालयात आज शुक्रवारी भेट देऊन जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेचा विस्तृत आढावा त्यांनी घेतला. जिल्ह्यात आकस्मिक आलेल्या वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणचे खांब व तारा तुटून पडल्या त्यामुळे बंद पडलेली यंत्रणा चिखलात जाऊन अभियंते व जनमित्रांनी उभी करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला. यासंदर्भात सविस्तर माहिती मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री यांना दिली. तसेच या काळात अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.
कोव्हीड १९ विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी आहे त्यामुळे नागरिक घरी असून या सोबत अनेक जण घरूनच दैनंदीन कार्य करीत असल्यामुळे फार मोठी जवाबदारी ही महावितरणची आहे. त्यामुळे घरी असलेल्या नागरिकांसह याविरुद्ध लढा देणाऱ्या सर्वच यंत्रणांना अखंडित विद्युत पुरवठा करून बॅकअप देण्याचे कार्य महावितरणचे सर्व कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे यापुढेही अशाच प्रकारे उत्कृष्ठ ग्राहक सेवा देण्याचे निर्देश त्यांनी उपस्थितांना दिले.