नाशिक । प्रतिनिधी
करोना संकटाशी जिल्हा प्रशासन दोन हात करत असताना जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात यंदा ३८ टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. सर्वाधिक १७ टॅकर येवल्यात सुरु आहे. गतवर्षी जिल्ह्यात २०० हून अधिक टँकर सुरु होते.
गतवर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली होती. नोव्हेंबर पर्यंत परतीचा पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे यंदा उन्हाळयात जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही . जिल्ह्यात यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असून ग्रामीण भागात पुरेसा जलसाठा आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. सर्वाधिक १७ टॅकर हे येवला तालुक्यात सुरु आहे. त्या खालोखाल सुरगाणा ७ , पेठ ५, त्र्यंबक व बागलाण प्रत्येकी ३, देवळा २ व नांदगाव तालुक्यात एक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याद्वारे ५५ गावे व ३२ वाडयांना पाणीपुरवठा केला जात आहे. १९ खासगी तर १९ टॅकरद्वारे तहान भागविली जात आहे.